साईबाबा संस्थानने 2009 साली प्रसादालयात अन्न शिजवण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा यंत्रणांपैकी एक प्रकल्प बसविला आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले असून, पुढील 15 दिवसांत ही टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हेच ओळखून संस्थानने या यंत्रणेची सुरू असलेली देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने थांबवून प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू केला आहे. या सौर ऊर्जेच्या माध्यमातून दररोज पाच टन भात आणि डाळ शिजवली जात असून, दररोज सुमारे 200 किलो एलपीजी गॅसची मोठी बचत होत आहे.
advertisement
काय आहे नियोजन?
साई प्रसादालयात दररोज 35 ते 40 हजार भाविक भोजन करतात, तर उत्सवाच्या काळात ही संख्या 50 हजारांच्या पार जाते. संपूर्ण प्रसादालयासाठी दररोज सुमारे 2 टन गॅसची गरज भासते. गॅसची टंचाई अशीच कायम राहिली तर आगामी 'श्रीरामनवमी' उत्सवात मोठी अडचण निर्माण होऊ शकते. या गर्दीत भाविकांना भोजन मिळावे यासाठी संस्थानला लाडू आणि बुंदीची निर्मिती बंद करावी लागू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जास्तीत जास्त भाविकांना भोजन देता यावे यासाठी चपाती आणि वरण यामध्ये काही बदल करून नियोजन केले जाणार आहे.
अन्नछत्र सुरूच राहणार
युद्धाच्या परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यात मर्यादा आल्या आहेत. तरीही, साई संस्थानाकडून भाविकांच्या प्रसादात खंड पडू नये यासाठी सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे गॅस टंचाई असतानाही शिर्डीत साई भक्तांना अन्नप्रसादाचा लाभ मिळत राहणार आहे.
नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण
शहरातील हॉटेल व्यवसायापाठोपाठ आता आयटी क्षेत्रालाही या टंचाईचा फटका बसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुरवठा कधी सुरळीत होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घरगुती गॅसच्या दरात व पुरवठ्याच्या कालावधीतही वाढ करण्यात आली आहे. कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांसह अनेक लघुउद्योजक अडचणीत आले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हे ही वाचा :
