नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांच्या प्रकरणाला आता तीव्र राजकीय वळण लागले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. "आपल्या राजकीय करिअरसाठी जयंत पाटील यांनी अशोक खरातकडून रक्ताने अंघोळ घातली होती का?" असा जळजळीत सवाल पडळकरांनी उपस्थित केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
advertisement
रक्ताने अंघोळ आणि नरबळीचा संशय?
पडळकर यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, अशोक खरात हा सांगलीतील ईश्वरपूर (इस्लामपूर) येथे दोन दिवस मुक्कामी होता. "खरातने नरबळी दिल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे, मग जयंत पाटील यांना ज्या रक्ताने अंघोळ घातली, ते रक्त कोणाचे होते? हे समोर आले पाहिजे," असा खळबळजनक दावा पडळकरांनी केला. तसेच, खरातने पीडित महिलांना लघवी पाजल्याचा आरोप असताना, "जयंत पाटलांनीही त्याचे मूत्र प्राशन केले असेल, म्हणूनच त्यांना राजकीय ताकद मिळाली असेल," असा जहरी टोलाही त्यांनी लगावला.
जयंत पाटलांच्या पुरोगामीत्वावर प्रश्नचिन्ह
एकीकडे फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे अशा अघोरी पूजा करायच्या, असे म्हणत पडळकरांनी राष्ट्रवादीच्या पुरोगामीत्वावर हल्ला चढवला. "अशोक खरातच्या आश्रमासाठी ४० किलोमीटरची पाण्याची पाईपलाईन कोणाच्या सांगण्यावरून दिली? यात जयंत पाटलांचा मोठा सहभाग दिसतोय," असा थेट आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण, जयंत पाटलांचे काय?
मुख्यमंत्र्यांचा खरातसोबतचा फोटो एका सार्वजनिक कार्यक्रमातील आहे, त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, जयंत पाटील आपल्या मुलाला घेऊन खरातच्या ईशान्येश्वर मंदिरात पूजेसाठी गेले होते, ही गोष्ट अत्यंत घातक आहे, असे पडळकर म्हणाले. "मी आता जयंत पाटलांच्या डोक्यावर कलश ठेवून पूजा केल्याचा व्हिडिओ कधी बाहेर येतोय, याचीच वाट पाहतोय," असेही त्यांनी शेवटी नमूद केले.
