सांगलीतल्या दसरा मेळावा बोलताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निशाण्यावर जयंत पाटील होते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना समज दिली होती. मात्र त्यानंतर जयंत पाटलांवरील टीकेनंतर विरोधकांनी पडळकरांवर टीकास्त्र डागलंय. 22 सप्टेंबरला सांगलीत पवारांच्या पक्षाच्या सभेत करण्यात आलेल्या टीकेला हे उत्तर असल्याचं पडळकरांनी म्हटलंय. या सभेला उत्तर म्हणून भाजपच्या इशारा सभेत बोलताना गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांविरोधातील आपली आक्रमणाची तलवार म्यान केलेली नाही. लक्षात ठेवा, आरेला कारे करणारच, तुम्ही कानाखाली लगावली तर मी दोन लगावेन, असे पडळकर म्हणाले. 'भाजपनं सांगितलं पाहिजे जयंत पाटील यांना पक्षात घेणार नाही आणि घेतला तरी मागच्या रांगेत बसावं लागेल, असे पडळकर म्हणाले.
advertisement
वार झाला तर पलटवार होणार असं सांगत मंत्री चंद्रकांत पाटलांनीही एकप्रकारे गोपीचंद पडळकरांची पाठराखण केलीय. जयंत पाटील जर भाजपमध्ये आले तर त्यांना पडळकरांचा विजय असो अशी घोषणा द्यावी लागेल , असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. गोपीचंद पडळकर यांच्या पाठोपाठ चंद्रकांत पाटील यांनीही जयंत पाटील यांना डिवचलं आहे.
गोपीचंद पडळकरांनी केलेल्या या टीकेबाबत विरोधकांनी टीकास्त्र डागलंय. राज्यात सुरू असलेल्या राजकीय वार-पलटवाराबाबत बोलताना राजकीय मतभेद असले तरी महाराष्ट्राची संस्कृती जपली जावी असं मत अजित पवारांनी व्यक्त केलंय.
सांगलीत जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात गेल्या काही दिवसात विस्तवही जात नाही. गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांविरोधातील आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवल्यानं सांगलीतल्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच राहणार असल्याची शक्यता आहे.