राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड आज घडणार आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची बहुप्रतिक्षित युती अखेर जाहीर होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांच्या उपस्थितीत या युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. केवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता ही युती संपूर्ण राज्यभर लागू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
advertisement
काँग्रेसचे वंचितसोबत युती करण्याचे मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, विविध राजकीय कारणांमुळे हे प्रयत्न प्रत्यक्षात येऊ शकले नव्हते. काही वर्षांनंतर अखेर काँग्रेस आणि प्रकाश आंबडेकर वंचित यांच्यात युती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घडामोडीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जे बड्या नेत्यांना जमलं नाही ते सपकाळांनी करुन दाखवलं...
काँग्रेसमधील दिग्गज नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही जे शक्य झाले नाही, ते सध्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी साध्य केल्याची चर्चा आहे. वंचितसोबत आघाडी घडवून आणण्यात सपकाळ यांची भूमिका निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे. सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेकांनी काँग्रेस हायकमांडच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. मात्र, सपकाळ यांनी संघटनात्मक बांधणीवर जोर दिल्याचे चित्र आहे.
राज्याच्या समीकरणात मोठा बदल?
या आघाडीमुळे आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. विशेषतः दलित, वंचित आणि अल्पसंख्याक मतदारांवर या आघाडीचा प्रभाव वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वंचितने खेचलेल्या मतांमुळे याआधी काँग्रेसला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता दोन्ही पक्षांची आघाडी झाल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत. काँग्रेस-वंचित युतीच्या घोषणेमुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या रणनीतींवरही परिणाम होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
