हवामान विभागाने आजपासून (28 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली होती. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक आणि पुणे घाट माथ्यावरही रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यासह कल्याणमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अजूनही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असं प्रशासनाने आवाहन केलं आहे.
advertisement
Monsoon Health: पावसाळ्यातील आजारांचं कारण काय? अशी काळजी घेतल्यास राहाल सुरक्षित
मुंबईत मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रात्रभरात 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वांद्रे परिसरातही जोरदार पाऊस पडत असून वांद्रे-सी लिंकवर भर दुपारी अंधार दाटून आला आहे. आज रविवार असल्याने शाळा आणि बहुतांश कार्यालयं बंद आहेत. तरी देखील महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलीस प्रशासन सतर्क असून, संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
मुंबईशिवाय, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्यात.