खंजिराने सपासप वार
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना जुन्या वादातून आणि आपसातील कुरबुरीतून घडली असल्याचे समोर आले आहे. आदित्य सूर्यवंशी हा रेल्वे स्टेशन परिसरात असताना अचानक तीन तरुणांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर खंजिराने सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, हल्लेखोरांनी धारदार खंजिराने आदित्यच्या पोटात वार केले. त्यातील एका आरोपीने तर क्रूरतेची सीमा ओलांडत जखमी आदित्यला मोठ्या दगडाने देखील बेदम मारहाण केली आहे.
advertisement
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
सदर संपूर्ण घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भरदिवसा आणि लोकांची वर्दळ असताना आरोपींनी कोणत्याही भीतीविना हे कृत्य केले. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून, तो पाहून कोणाचेही काळीज थरारेल असा आहे. रेल्वे स्टेशन परिसरातून ये-जा करणारे नागरिक या प्रकारामुळे हादरून गेले होते. दिवसाढवळ्या अशा प्रकारे शस्त्रे नाचवत हल्ला झाल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
तिन्ही आरोपी पसार
हिंगोली पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत त्वरित तपासचक्रे फिरवली आहेत. या प्रकरणी प्रथम कुऱ्हे, विकास खंदारे आणि अरबाज नावाच्या तीन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनेनंतर हे तिन्ही आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जखमी आदित्य सूर्यवंशी याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असून त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
लवकरात लवकर अटक करण्याची मागणी
पोलीस प्रशासनाकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. अशा घटनांमुळे शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. भरवस्तीत झालेला हा खंजिराचा हल्ला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. आता या प्रकरणातील मुख्य आरोपींना पोलीस कधीपर्यंत बेड्या ठोकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
