मुंबई : शिधापत्रिका धारकांसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. जर तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी (e-KYC) पूर्ण नसेल, तर भविष्यात मोफत किंवा अनुदानित रेशन मिळणे बंद होऊ शकते. इतकेच नव्हे तर, शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सदस्यांचे नाव रेशन कार्डमधून वगळले जाण्याचीही शक्यता आहे. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला रेशन कार्ड हा केवळ धान्य मिळवण्यासाठीच नव्हे, तर अनेक ठिकाणी ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणूनही वापरला जातो. त्यामुळे शिधापत्रिकेची नियमित पडताळणी आणि ई-केवायसी करणे आता अनिवार्य ठरणार आहे.
advertisement
नवीन नियमांनुसार, प्रत्येक रेशन कार्डधारकाने दर पाच वर्षांनी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेषतः २०१३ च्या सुमारास किंवा त्याआधी ज्या लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती, त्यांना आता आपली शिधापत्रिका पुन्हा अद्ययावत करावी लागणार आहे. सरकारचा उद्देश अपात्र लाभार्थी, बनावट नावे आणि दुहेरी रेशन कार्ड यांना आळा घालणे हा आहे. दिलासादायक बाब म्हणजे, डिजिटल तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया आता अधिक सोपी झाली असून बहुतांश नागरिक घरबसल्या मोबाईलवरून ई-केवायसी पूर्ण करू शकतात.
ऑनलाइन पद्धतीने ई-केवायसी कशी कराल?
घरबसल्या रेशन कार्डची ई-केवायसी करण्यासाठी काही सोप्या टप्प्यांत प्रक्रिया पूर्ण करता येते. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये ‘मेरा रेशन’ आणि ‘आधार फेसआरडी’ ही अॅप्स प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावीत. अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर आपले राज्य व जिल्हा निवडून लोकेशन निश्चित करावे लागते. त्यानंतर आधार क्रमांक, कॅप्चा कोड आणि मोबाईलवर आलेला ओटीपी टाकावा लागतो. ही माहिती भरल्यानंतर आधारशी संबंधित तपशील स्क्रीनवर दिसतो. पुढील टप्प्यात फेस ई-केवायसी या पर्यायावर क्लिक करून मोबाईलच्या सेल्फी कॅमेऱ्याद्वारे चेहरा स्कॅन करावा लागतो. ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर ई-केवायसी पूर्ण झाल्याचा संदेश दिसतो.
ई-केवायसी पूर्ण झाली आहे की नाही? हे तपासण्यासाठीही अॅपच्या माध्यमातून सोपी व्यवस्था उपलब्ध आहे. ‘मेरा रेशन’ अॅप पुन्हा उघडून लोकेशन निवडल्यानंतर आधार क्रमांक, कॅप्चा आणि ओटीपी भरावा लागतो. त्यानंतर रेशन कार्ड ई-केवायसीची स्थिती स्क्रीनवर दिसते. जर स्टेटसमध्ये ‘Y’ असे दिसले, तर ई-केवायसी पूर्ण झाल्याचे समजावे. तर ‘N’ स्टेटस असल्यास अजून प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, असे मानावे.
ज्या लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने ई-केवायसी करता येत नाही किंवा तांत्रिक अडचणी येतात, त्यांच्यासाठी ऑफलाइन पर्यायही उपलब्ध आहे. अशा नागरिकांनी थेट आपल्या जवळच्या रेशन दुकानात किंवा सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रावर जाऊन ई-केवायसी करून घेता येते. यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत नेणे आवश्यक आहे. संबंधित कर्मचारी बायोमेट्रिक किंवा अन्य प्रक्रियेद्वारे ई-केवायसी पूर्ण करून देतात.
एकूणच, रेशन कार्डशी संबंधित लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे आता अत्यावश्यक झाले आहे. वेळेत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास रेशनचा लाभ थांबण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक रेशन कार्डधारकाने तात्काळ आपली ई-केवायसी स्थिती तपासून आवश्यक ती कारवाई करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
