मुंबई : शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड हे केवळ स्वस्त दरात धान्य मिळवण्याचे साधन नाही, तर अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे ओळखपत्र आहे. मात्र, वर्षानुवर्ष वापरलेले रेशन कार्ड अचानक एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी काढले असता त्यामध्ये नाव, जन्मतारीख किंवा इतर तपशीलांतील चूक समोर येते. अशा वेळी नागरिक गोंधळात पडतात. रेशन कार्डमधील ही किरकोळ वाटणारी चूक भविष्यात मोठा अडथळा ठरू शकते. त्यामुळे वेळेत दुरुस्ती कशी करायची, याची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.
advertisement
भारत सरकार देशातील गरीब, गरजू आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पात्र कुटुंबांना अत्यल्प दरात तांदूळ, गहू आणि इतर धान्य पुरवले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड अनिवार्य आहे. याशिवाय उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, विविध शासकीय अनुदान योजना तसेच ओळखपत्र म्हणूनही रेशन कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
देशात उत्पन्न, कुटुंबातील सदस्यसंख्या आणि आर्थिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रकारची शिधापत्रिका दिली जाते. सर्वच रेशन कार्डधारकांना समान सवलती मिळत नाहीत. त्यामुळे रेशन कार्डवरील माहिती अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक, जन्मतारीख चुकीची नोंद, कुटुंबातील सदस्यांची माहिती गहाळ असणे किंवा पत्ता चुकीचा असणे, अशा कारणांमुळे अनेक वेळा रेशन कार्डचा लाभ थांबवला जाऊ शकतो.
दुरुस्ती कशी करायची?
सुदैवाने, आता रेशन कार्डमधील दुरुस्तीची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज उरलेली नाही. दुरुस्ती करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागते. त्या ठिकाणी ‘रेशन कार्ड दुरुस्ती’ किंवा ‘करेक्शन इन रेशन कार्ड’ असा पर्याय उपलब्ध असतो.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकावा लागतो. त्यानंतर शोध (Search) बटणावर क्लिक केल्यास रेशन कार्डशी संबंधित संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसते. येथे नाव, जन्मतारीख, पत्ता किंवा कुटुंबातील सदस्यांची माहिती यामध्ये आवश्यक ते बदल करता येतात. बदल करताना आधार कार्ड किंवा इतर वैध कागदपत्रांनुसारच माहिती भरावी, असा सल्ला दिला जातो.
सर्व माहिती अपडेट केल्यानंतर ‘सबमिट’ या पर्यायावर क्लिक करून अर्ज अंतिम करावा लागतो. अर्ज सबमिट झाल्यानंतर संबंधित विभागाकडून पडताळणी केली जाते. काही दिवसांत दुरुस्ती मंजूर झाल्यास अद्ययावत रेशन कार्ड उपलब्ध होते.
