नागपूरमध्ये शिक्षण विभाग नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. विदर्भात सध्या तापमान तब्बल 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असताना, 15 जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आला आहे. सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्यात येणार आहे. सकाळी ७ ते ११ :४५ वाजेपर्यंत शाळा सुरू करण्यात येणार आहे. ३० जून २०२६ नंतर नियमित सुरू राहणार आहे.
advertisement
इतक्या उन्हाला मुलांना का पाठवायचं?
पण, या निर्णयामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. इतक्या भीषण उष्णतेत लहान मुलांना घराबाहेर काढणं म्हणजे त्यांच्या आरोग्याला थेट धोका निर्माण करणं, असं पालकांचं स्पष्ट मत आहे. उन्हाच्या झळा, डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका वाढलेला असताना, शाळा सुरू करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कोर्टात जाण्याचा पालकांचा इशारा
तसंच, शिक्षकांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त करत, तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपेक्षा प्रशासनासाठी दिनदर्शिका महत्त्वाची आहे का, असा संतप्त सवालही विचारला जात आहे. दरम्यान, काही सामाजिक संस्था आणि शिक्षक संघटनांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी तडजोड करणारा हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
