श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर समितीकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या पवित्र मूर्तींच्या सुरक्षितता आणि दीर्घकालीन संवर्धनाच्या दृष्टीने श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI), छत्रपती संभाजीनगर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्तींची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर लेखी अहवाल सादर केला आहे.
advertisement
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून प्राप्त झालेल्या या अहवालास श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समितीची मंजुरी घेऊन, पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सदर अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
सन २०२० मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर वज्रलेपाची संवर्धन प्रक्रिया करण्यात आलेली असून, सध्या दोन्ही मूर्ती पूर्णतः सुरक्षित स्थितीत आहेत. पण, भविष्यात मूर्तींची कोणतीही झीज अथवा नुकसान होऊ नये, या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना शासनाच्या मंजुरीनंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहेत.
भाविकांना आवाहन
यासंदर्भात श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने वारकरी, भाविकांना आणि नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्ती पूर्णतः सुरक्षित आहेत. मूर्तींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी शासन, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि मंदिर समिती यांच्यात समन्वयाने कार्यवाही सुरू असून, भाविकांच्या श्रद्धेच्या दृष्टीने मूर्तींच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. पण, मूर्तीची झीज होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मंदिर समितीने दक्षता घेतली असल्याचं यावेळी औसेकर यांनी सांगितलं.
