जालना : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षांचे निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या एमएच सीईटी परीक्षेचा निकालही नुकताच जाहीर झाला आहे. या महत्त्वाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पुढे काय करावे, असा प्रश्न असतो.
प्रवेश प्रक्रिया, फी किती असेल, महाविद्यालयाची निवड याबाबत बराच गोंधळ असतो. हा गोंधळ दूर व्हावा म्हणून जालना शहरातील जालना एज्युकेशन फाउंडेशन (JEF) या संस्थेने महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे. या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. हा नेमका उपक्रम काय आहे, याबाब लोकल18 च्या टीमने घेतलेला विशेष आढावा जाणून घेऊयात.
advertisement
20 हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ -
विद्यार्थ्यांचा पायाभूत शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा म्हणून जालना शहरात जालना एज्युकेशन फाउंडेशन ही संस्था कार्यरत आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांवर विशेष करून या संस्थेचे लक्ष असतं. विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती यासारखे उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात. बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या बाबतीत असलेला गोंधळ कमी करण्यासाठी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केलं जात आहे. या मोफत मार्गदर्शनाचा तब्बल 20 हजार विद्यार्थी लाभ घेतील, असा विश्वास जेईएफचे प्राध्यापक सुरेश लाहोटी यांनी व्यक्त केला.
बारावीनंतर अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये करिअर विषयी असलेला संभ्रम दूर करण्यासाठी हे मोफत मार्गदर्शन आम्ही आयोजित करत आहोत. सजग पालक विशिष्ट अशी फी भरून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देतात. मात्र, शिक्षणाविषयी फारसे सहज नसलेल्या पालकांकडे ही सोय उपलब्ध नसते. अशाच पालकांच्या पाल्यांसाठी आम्ही ही सुविधा उपलब्ध करत आहोत. इतर शहरांमध्ये समुपदेशनासाठी 15 हजार रुपयांपर्यंत फी आकारली जाते. पण जालना शहरातील होतकरू आणि हुशार मुलांच्या करिअरचा विचार करून त्यांना मार्गदर्शन केले जात आहे, असेही सुरेश लाहोटी यांनी सांगितले.
महत्त्वाची बातमी! आता घरी बसूनच बुक करता येणार स्मार्टसिटी बसचे तिकीट, काय कराल?
जालना एज्युकेशन फाउंडेशन मार्फत सुरू असलेल्या या मोफत मार्गदर्शन कार्यक्रमात फक्त अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनाच मार्गदर्शन केले जात आहे असे नाही तर सर्वच क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यातील गुण हेरून योग्य असे मार्गदर्शन केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास लाहोटी यांनी व्यक्त केला.





