जालना शहरात दररोज सुमारे 35 दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होते, ज्याचा बहुतांश भाग थेट नदीत किंवा जवळपासच्या जलस्त्रोतांमध्ये सोडला जातो. यामुळे जलप्रदूषण आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता 40 दशलक्ष लिटर प्रतिदिन इतकी असून, तो पूर्ण झाल्यास हे सांडपाणी शुद्ध करून शेतीसाठी आणि औद्योगिक वापरासाठी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, सांडपाण्यातील घनकचरा वेगळा करून जैविक प्रक्रियेद्वारे पाणी शुद्ध केले जाईल.
advertisement
प्रकल्पाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, 2025 च्या मध्यापर्यंत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यासाठी सुमारे 150 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरातील जलप्रदूषण 80 टक्क्यांपर्यंत कमी होईल आणि पाण्याचा पुनर्वापर वाढेल, असं जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खेडकर यांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाचे स्वागत केले असले, तरी काहींनी कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, या प्रकल्पामुळे जालना शहराचा पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होईल आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठीही हा उपाय ठरेल. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास मराठवाड्यातील इतर शहरांसाठीही तो प्रेरणादायी ठरू शकतो.





