MSRDC कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गॅन्ट्री उभारणीचे काम एकूण 21 टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. प्रत्येक टप्प्यात ठराविक कालावधीसाठी महामार्गावरील एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात येईल. मुंबई किंवा नागपूर दिशेकडील वाहतूक सुमारे 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णतः थांबवण्यात येणार असून, काम पूर्ण होताच त्या बाजूची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू केली जाईल.
advertisement
कात्रज–कोंढवा रस्त्याचे होणार काम, भूसंपादन शेवटच्या टप्प्यात, कसा आहे 710 कोटींचा मार्ग?
या कालावधीत समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन MSRDC आणि वाहतूक प्रशासनाने केले आहे. आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गांचा वापर करावा, वेळेची योग्य आखणी करावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टममुळे महामार्गावरील वेग नियंत्रण, नियमभंगावर नजर, अपघातांची माहिती तात्काळ मिळणे आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक जलद होणे शक्य होणार आहे. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने समृद्धी महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. प्रवाशांनी सहकार्य केल्यास हे काम सुरक्षितरीत्या आणि ठरलेल्या वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असेही MSRDC कडून स्पष्ट करण्यात आले आहे.






