जयंत पाटील यांची सातत्याने भाजपत जाणार, अशी चर्चा चर्चा सुरू होते. त्यात मागील आठवड्यात जयंत पाटील यांच्या सांगलीतील कार्यक्रमाला नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावल्याने या चर्चा अधिक जोरदारपणाने रंगवल्या जात आहेत. मात्र या भेटीविषयी खुद्द जयंत पाटील यांनीच माहिती दिली आहे.
होय, मी बावनकुळेंची भेट घेतली... जयंत पाटलांची कबुली
मतदारसंघातील कामासाठी मी चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटलो, अशी कबुली त्यांनी जाहीरपणे दिली आहे. माझ्यासोबत शिष्टमंडळ होते, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ निवेदनांवर चर्चा करून २५ मिनिटांत त्यांच्या घरून बाहेर पडलो, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
advertisement
मतदारसंघातील प्रश्न होता, राज्यासाठीचा महत्त्वाचा होता
जयंत पाटील म्हणाले, काल संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी माझी आणि बावनकुळे यांची भेट झाली. सांगली जिल्ह्यातील महसूल प्रश्नांवर मी त्यांना दहा-बारा निवेदने दिली. ती निवेदने देण्यासाठीच त्यांची वेळ मागितली होती.
महसूल विभागात सातबारा संगणकीकरण म्हणजेच ऑनलाइन झाले आहे. त्याच्या दुरुस्त्या वेळेवर होत नाहीत. हा राज्याचा प्रश्न होता. त्याकडे त्यांचे लक्ष वेधले. त्याचबरोबर अनेक जमिनींच्या संपादनाचे विषय होते. जिल्ह्यातील बरेच प्रश्न होते . त्यासाठी त्यांना भेटलो, असे जयंत पाटील म्हणाले.
निवेदनांचे रेकॉर्ड बघा, मी त्यांना १३ ते १४ निवेदने दिली...
सहा वाजताची अपॉइंटमेंट होती. मात्र त्यांची हेअरिंग बराच वेळ चालली. त्यामुळे सात वाजून पन्नास मिनिटांनी भेटलो. बरोबर २५ मिनिटे त्यांच्या निवासस्थानी होतो. यात कोणतीही राजकीय चर्चा नाही . सोबत राधाकृष्ण विखे पाटील होते. तसेच मतदारसंघातील प्रश्न असल्याने शिष्टमंडळही होते. निवेदनांचे रेकॉर्ड बघा. मी त्यांना १३ ते १४ निवेदने दिली, असे जयंत पाटील यांनी सांगितले.