सांगलीच्या वाळवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिवसेना महायुतीच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सदाभाऊ खोत यांनी फटकेबाजी केली. या सभेत त्यांनी जयंत पाटील यांना चिमटे काढले.
ते बाळ सत्तेशिवाय जगू शकत नाही
भाजपाने त्यांना घ्यायचं का नाही, ते बघावे. कारण सत्तेविना ते बाळ जगू शकत नाही. कधी उडी मारायचे यासंदर्भात ते चाचपणी करीत आहेत असा टोला देखील जयंत पाटलांचे नाव न घेता सदाभाऊ खोतांनी लगावला आहे.
advertisement
काटे उलटे फिरायला लागले आहेत, थोड्याच दिवसांत ते भाजपमध्ये येतील
जयंत पाटील २० वर्षे मंत्री होते. वाळवा शेरगावचा पूल २० वर्ष त्यांनी का केला नाही? २० वर्षांत त्यांनी पाणंद रस्ते का केले नाहीत? या परिसरात त्यांनी पाणी योजना का केल्या नाहीत? कारण त्यांना विकास करायचा नाही. जनतेला त्यांना गरिबीतच ठेवायचे आहे. आता काटा उलटे फिरायला लागले आहेत. थोड्या दिवसात ते भाजपमध्ये येतील. सत्तेविना ते जगू शकत नाही. संधी पाहून ते उडी मारतील, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
जनसेवेचे एक काम केले नाही, जनता त्यांच्या पायात पत्रा ठोकल्याशिवाय राहणार नाही
क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्मारक या भूमीत व्हावे, असे कधीही त्यांच्या मनात आले नाही. समाजासाठी त्यांचे कोणतेही काम नाही. जनसेवेचे एक काम केले नाही. त्यामुळे त्यांच्या पायात या निवडणुकीत जनता पत्रा ठोकल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
