काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या रविवारी प्रभाग २९ च्या भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत रवी पाटील आणि नितीन पाटील यांनी त्यांना मारहाण केली होती. या हल्ल्यात ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी १० ते १२ जणांवर गुन्हे दाखल केले होते.
advertisement
रात्रीच पोलिसांची कारवाई
मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता प्रचार संपल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत दोन्ही उमेदवारांना ताब्यात घेतले. अटकेच्या प्रक्रियेदरम्यान दोघांचीही प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री उशिरा डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली असून त्यात उमेदवारांच्या मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी तुकाराम नगर आणि रुग्णालय परिसरात जवळपास २०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर अटक झाल्याने हे दोन्ही उमेदवार स्वतःचे मतदान करू शकणार का? याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
'ही तर पोलिसांची दडपशाही', आमदार राजेश मोरे यांचा आरोप
घटनेची माहिती मिळताच शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. "आमच्या उमेदवारांची प्रकृती स्थिर नसतानाही पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. ही सरळ सरळ दडपशाही असून प्रशासनाने सूडबुद्धीने कारवाई केली आहे. जर उमेदवारांच्या जिवाला काही झाले, तर त्याला सर्वस्वी पोलीस जबाबदार असतील," असा इशारा आमदार मोरे यांनी दिला आहे.
सध्या डोंबिवलीत राजकीय वातावरण कमालीचे तापले असून मतदानाच्या दिवशी याचे काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
