कल्याण : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आज संपला आहे. अर्ज भरण्याची मुदत संपताच भाजपने महाराष्ट्रात खातं उघडलं असून मतदानाआधीच त्यांचा पहिला नगरसेवक निवडून आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपने खातं उघडलं आहे. पॅनल क्रमांक 18 अ मध्ये भाजप उमेदवार रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला, त्यामुळे रेखा चौधरी यांचा बिनविरोध निवडून यायचा मार्ग मोकळा झाला आहे.
advertisement
18 अ प्रभागात ओबीसी महिला आरक्षित जागेसाठी भाजपच्या रेखा चौधरी यांचा एकच अर्ज आल्यामुळे जवळपास त्यांची उमेदवारी बिनविरोध झाली आहे. महापालिका निवडणुकीसाठी 31 डिसेंबरला उमेदवारांच्या अर्जांची छाननी होणार आहे. या छाननीमध्ये रेखा चौधरी यांचा उमेदवारी अर्ज मंजूर झाला तर त्यांचा बिनविरोध नगरसेवक व्हायचा मार्ग मोकळा होईल. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून रेखा चौधरी यांच्या कागदपत्रांची पडताळणी बुधवारी होईल, त्यानंतरच रेखा चौधरी या बिनविरोध निवडून आल्याची अधिकृत घोषणा केली जाईल.
महायुतीचा सामना ठाकरे बंधूंसोबत
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप महायुतीचा सामना हा ठाकरे बंधूंसोबत आहे. केडीएमसी निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना 73 जागांवर लढत आहे तर राज ठाकरेंच्या मनसेला 49 जागा मिळाल्या आहेत. 15 जानेवारीला कल्याण-डोंबिवलीच्या 122 जागांसाठी मतदान पार पडेल, यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारीला मतमोजणी होईल.
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना-भाजपने शेवटपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती. बंडखोरी आणि नाराजी टाळण्यासाठी दोन्ही पक्षांकडून उमेदवारांना थेट एबी फॉर्म दिले गेले. दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची गर्दी जास्त असल्यामुळे नाराजीचं प्रमाण वाढत होतं, त्यामुळे दोन्ही पक्षांकडून सावध पवित्रा घेत उमेदवारी जाहीर केली गेली नाही, असं सांगण्यात येत आहे. तरीही काही ठिकाणी बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली आहे, या बंडखोरांची उमेदवारी मागे घ्यायचं आव्हान आता शिवसेना-भाजपसमोर असणार आहे. 31 तारखेला अर्जांची छाननी झाल्यानंतर 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
