तज्ज्ञांच्या मते, गुडघेदुखीचं प्रमाण वाढण्यामागे चुकीची बैठकशैली, दीर्घकाळ बसून राहणे, व्यायामाचा अभाव तसेच वाढलेलं वजन हे घटक कारणीभूत आहेत. ग्रामीण भागात शेतमजुरीमुळे तर शहरी भागात बसून काम करण्याच्या पद्धतीमुळे गुडघ्यावर येणारा ताण समानच आहे. याशिवाय कॅल्शियम व व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळं हाडं कमकुवत होतात.
advertisement
काही घरगुती उपायांच्या मदतीने हा त्रास कमी करता येतो. गरम पाण्याने शेक दिल्याने स्नायूंचा ताण कमी होतो आणि वेदना कमी जाणवतात. हळदीचं दूध, मेथीचे दाणे, आलं व लसूण यांचा नियमित आहारात समावेश केल्यास शरीरातील दाह कमी होतो. तिळाच्या किंवा नारळाच्या तेलाने मालिश केल्यास रक्ताभिसरण सुधारते व वेदनांमध्ये आराम मिळतो. तसेच साधी योगासनं आणि स्ट्रेचिंग केल्याने गुडघे मजबूत होतात.
गुडघेदुखी वाढल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. डॉक्टर तपासणी करून आवश्यक असल्यास एक्स-रे किंवा एमआरआय करून अचूक निदान करतात. त्यानंतर औषधोपचार, फिजिओथेरपी, किंवा गुडघ्यात दिली जाणारी विशेष इंजेक्शन थेरपी सुचवली जाते. काही रुग्णांना कॅल्शियम, व्हिटॅमिन डी किंवा ग्लुकोसामिनसारखे सप्लिमेंट्स दिले जातात. मात्र, गुडघा पूर्ण झिजल्यास कृत्रिम गुडघा प्रत्यारोपण (Knee Replacement) हा अंतिम उपाय ठरतो.
एकूणच, गुडघेदुखी हा वेदनादायी आजार असला तरी योग्य आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि घरगुती उपायांच्या मदतीने त्याची तीव्रता टाळता येऊ शकते. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार घेतल्यास गुडघ्याचं आरोग्य दीर्घकाळ टिकवता येतं.