त्यानंतर मोहीम फत्ते?
पोलीस ठाण्याच्या शांतीसाठी प्रवेशद्वाराजवळ बकऱ्याचा बळी दिल्यानंतर उदगीर ग्रामीण पोलिसांनी मोठी मोहिम फत्ते केली आहे. अनेक दिवसांपासून घरफोडी करून सोने चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केलंय. विशेष म्हणजे उदगीर ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात जाऊन एक आरोपी तसेच बीड जिल्ह्यातून आणि धाराशिव जिल्ह्यातून आरोपींना अटक करून अनेक दिवसांपासून रखडलेली कामगिरी फत्ते केली. मात्र, बकऱ्याचा बळी दिल्यानंतर उदगीर ग्रामीण पोलिसांना यश मिळाल्याच्या चर्चेला आता उधाण आलंय.
advertisement
बकऱ्याचा बळी का?
गेल्या काही दिवसांपासून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघात आणि गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय शोधण्यासाठी बोकडाचा बळी देण्याची कल्पना एका अधिकाऱ्याच्या डोक्यात आली. त्यामुळे या वरिष्ठ अधिकाऱ्याने क्रमांक तीनच्या अधिकाऱ्यांवर बोकड आणण्याची आणि पुढील विधी पार पाडण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली. यातील एका अधिकाऱ्याने एक बोकड आणि त्याला कापणारा कसाईला पोलीस ठाण्यात आणले. धक्कादायक म्हणजे हा बोकड थेट पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच कापण्यात आला. पोलिसांच्या कृतीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
वाचा - प्रवाशांनी तुडूंब भरलेली रो-रो बोट आदळली जेट्टीला! काळाजाचा ठोका चुकवणारा, Video
मटण बिर्याणीवर ताव
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकाराला संपूर्ण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याचंही समर्थन होतं. बळी दिलेल्या बोकडाच्या मटणाची बिर्याणी करण्यात आली. त्यावर मग सर्वांनी ताव मारल्याचेही बोलले जात आहे. या प्रकरानंतर जागृत नागरिकांनी पुढे येत कारवाई करण्याची मागणी केली होती.
