इगतपुरी : नगरपरिषदेची निवडणूक ही रंजक ठरली त्यामागचे कारण ठरले संजय इंदुलकर. इगतपुरी नगरपरिषदेवर गेली तीस वर्ष एकहाती सत्ता राखणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर आणि उपनगराध्यक्ष नईम खान यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. एकूणच भाजपला मोठी ताकद मिळाली. मात्र निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे या विजयी झाल्या आहेत. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
advertisement
नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण?
मधू मालती मेंधरे यांना भाजपकडून तर शुभांगी दळवी यांना महाविकास आघाडीकडून तर शालिनी खताळे यांना शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती.
इगतपुरीला पर्यटनाचा दर्जा देण्याचा आश्वासन
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारादरम्यान महाबळेश्वरनंतर इगतपुरीला थंड हवेचे ठिकाण म्हणून मान्यता देऊन पर्यटनाचा दर्जा देऊन प्रचंड रोजगार उपलब्ध करून देऊ.असं आश्वासन दिले तसेच आडवण येथे महिंद्रा कंपनीचा प्लँट आणत बेरोजगारी दूर करू असेही ते म्हणाले.
पाण्याचा प्रश्न गंभीर
काही वर्षांपासून शहरातील पाणी पुरवठा, मुख्य रस्त्यांची डागडुजी, मलनिस्सारण व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, गार्डन आणि इतर अत्यावश्यक सुविधांचा अभाव नागरिकांना तीव्रतेने जाणवत आहे. पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी शहर परिसरात जवळपास चार हजार मिलिमीटर पाऊस एवढा प्रचंड पाऊस पडूनदेखील पाणीपुरवठा ही दीर्घकालीन समस्या आहे. आठवड्यातून तीन वेळेस पाणी पुरवठा होतो. त्यात कोणतेही वेळापत्रक नसल्याने दिवसभर महिलांसह नागरिकांना पाण्याची वाट बघावी लागते. 36 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना सुरळीत राबविण्यात अपयश आल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
