मुंबई : लोकसभा निवडणुकीत साताऱ्याच्या जागेवरून महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला होता. या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी दोघंही आग्रही होते. सुरूवातीला भाजपने उदयनराजेंना ही जागा राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढायला सांगितली, पण उदयनराजेंनी याला नकार दिला. एवढच नाही तर उदयनराजे दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. अखेर महायुतीमध्ये साताऱ्याची जागा भाजपला मिळाली आणि भाजपने उदयनराजेंची उमेदवारी जाहीर केली.
advertisement
साताऱ्याच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत अदलाबदली झाल्याचं आता समोर येत आहे. साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात भाजपने पियुष गोयल यांची रिक्त होणारी राज्यसभेची जागा राष्ट्रवादीला दिली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी दिली आहे.
भाजपने राज्यसभेचे खासदार असलेल्या पियुष गोयल यांना सगळ्यात सेफ समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तर पियुष गोयल यांना राज्यसभेचं सदस्यत्व सोडायला लागेल, या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार राज्यसभेवर जाईल, असं आश्वासन भाजपने दिल्याचं प्रफुल पटेल म्हणाले आहेत.
साताऱ्याची जागा भाजपला दिल्यानंतर नाशिकची जागा मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होती. नाशिकमधून छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, पण या जागेवर शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आहेत, जे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, त्यामुळे या जागेवर शिवसेनाही आग्रही आहे. नाशिकच्या जागेचा तिढा सुटत नसल्यामुळे अखेर छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन माघार घेत असल्याचं जाहीर केलं.
