मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये काही जागांवरून वाद सुरू आहेत, यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा समावेश आहे. शिवसेनेकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत, तर भाजपनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ भाजपचा आहे, कोणीही लुडबूड करू नये, असं नारायण राणे म्हणाले आहेत. तसंच माझं नाव भाजपने जाहीर केलं तर लढणार आणि जिंकणार, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या रत्नागिरी शहराजवळील पाली इथल्या निवासस्थानी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. परवा 4 एप्रिलला सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे. दुसरीकडे नारायण राणेदेखील उद्या सकाळी सिंधुदुर्गामध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यामुळे महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच सुरूच आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून सध्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विनायक राऊत हे खासदार आहेत. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना-भाजप युतीमध्ये मात्र या मतदारसंघावरून एकमत होताना दिसत नाहीये.
रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदीच उमेदवार असतील असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेच्या उमेदवारी बाबत बोलणं टाळलं आहे. रत्नागिरी शहरातील सावरकर नाट्यगृहात भाजपचा बूथ कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देणे टाळलं. तर नितेश राणे तडक निघून गेले. निलेश राणे यांनीही यावर बोलण्यास नम्रपणे नकार दिला.
सिंधुदुर्गातल्या कार्यकर्त्यांनी आमचं ठरलंय, असं म्हणत नारायण राणे यांचे बॅनर सोशल मीडिया वरती व्हायरल केले आहेत. त्यात सामंत बंधू अजूनही लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहेत, त्यामुळे या जागेवर उमेदवार कोण असणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
