अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार थोड्याच वेळात संपणार आहे, त्याआधी सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते जाहीर सभांमधून एकमेकांविरोधात टीका करत आहेत. चौथ्या टप्प्यात अहमदनगर आणि शिर्डीच्या जागेवरही मतदान पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या आमदाराने सकाळी शिर्डीच्या उमेदवाराचा प्रचार केला, यानंतर हा आमदार भाजप नेत्याच्या भेटीला गेला आहे.
शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची सदिच्छा भेट घेतली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकासआघाडीच्या प्रचाराची सांगता सभा राजूर गावात पार पडली. सभा संपल्यानंतर भास्कर जाधव यांनी मधुकर पिचड यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. या भेटीत भास्कर जाधव यांनी पिचड यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुखही भास्कर जाधव यांच्यासोबत उपस्थित होते.
advertisement
भाजपवर निशाणा
याआधी राजूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत भास्कर जाधव यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 'तुम्हाला 400 पार नाही तडीपार करणार. आमचा पक्ष फोडला गेला, विश्वासदर्शक ठराव आला तेव्हा आमच्या गटानेही अभिनंदन केलं, आता भारतात भाजपचे सरकार 100 टक्के तडीपार होणार. जनता जनार्दन आहे, तो पावला तरच गादीवर बसता येईल, याचं भान भाजपचे लोक विसरले आहेत. आता हे लोक जमिनीवर आले आहेत. यांच्या सभेला लोक बसत नाहीत. ज्याच्या खात्यात काहीही शिल्लक नाही असा सामान्य असलेल्या निलेश लंकेला उमेदवारी दिली आहे. युतीचे उमेदवार केवळ नाममात्र आहेत', अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
'आदिवासींची मतं मिळवण्यासाठी द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपती केलं, मात्र आजवर कुणी केला नाही एवढा अपमान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींचा केला आहे. देशाच्या संसदेचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करायला हवं होतं. प्रभू श्रीरामांच्या मूर्ती स्थापनेला विरोधी पक्षाला निमंत्रणच दिलं नाही. देशप्रमुख म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते करा ही विरोधकांची मागणी होती, पण ही मागणी मान्य केली गेली नाही', असे आरोप भास्कर जाधव यांनी केले आहेत.
