इराण आणि इस्रायल (मध्य पूर्व) मधील युद्धजन्य परिस्थितीमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून, भारतात एलपीजी (LPG) गॅसचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत एलपीजीचा तुटवडा असल्याने लोकांच्या गॅससाठी रांगा लागल्या आहेत. तर पुढच्या काळात गॅस मिळेल की नाही, अशी शंका असल्याने लोक आवश्यक नसतानाही अतिरिक्त साठा करीत आहेत. यावरच मार्ग काढण्यासाठी पाईप लाईनने गॅस कनेक्शनच्या निर्णयासंदर्भात सरकार पावले उचलण्याची शक्यता आहे.
advertisement
पाईप लाईन गॅस कनेक्शन मिळणार
भारत सरकारने पीएनजीची निर्मिती वाढवली असून आधी ९ लाख मेट्रिक टन गॅसची निर्मिती केली जाई, आता एलपीजीच्या तुटवड्यामुळे ११ लाख मेट्रिक टन गॅसची निर्मिती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने सर्व महानगरपालिका आणि नगर पालिकांना पीएनजी कनेक्शन देण्यासाठीच्या अटी आणि नियम शिथिल करण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री घेतला. पाणी आणि वीज कनेक्शन जसे मिळते, तसेच आता मागेल त्याला (शक्य असेल तिथे) पीएनजी अर्थात पाईप लाईनने गॅस कनेक्शन मिळणार आहे, याचसंदर्भातील निर्णय सरकार आज रात्रीपर्यंत घेऊ शकते.
पीएनजी गॅसच्या निर्णयाच्या संदर्भाने सरकारच्या हालचाली वाढल्या
विज्ञान भवन नवी दिल्ली येथे निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी आणि पीएनजी गॅसचा अधिक चांगला आणि सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे, तसेच निश्चित कालावधीत पीएनजी सेवांचा विस्तार करणेबाबत केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीनंतर पीएनजी गॅसच्या निर्णयाच्या संदर्भाने सरकारच्या हालचाली वाढल्या आहेत.
