मुंबईला लागून असलेल्या या महानगरपालिकांमध्ये सुरूवातीचा कल भाजप-शिवसेना महायुतीच्या बाजूने दिसत आहे.
ठाण्यात शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ठाण्यामध्ये भाजपच्या 6 तर शिवसेनेच्या 9 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. ठाण्यात सात उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने शिवसेनेने सुरुवातीची आघाडी घेतली असली, तरी अनेक प्रभागांत बंडखोरीने डोकेदुखी वाढवली आहे. भाजपमधून उमेदवारी न मिळाल्याने शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे उमेदवार आणि एकाच कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांविरुद्ध पुकारलेले बंड, यामुळे ठाण्याची लढत अत्यंत रंजक झाली आहे.
advertisement
नवी मुंबईत नाईकांच्या वर्चस्वाला आव्हान
नवी मुंबईमध्ये सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 2-2 जागांवर आघाडीवर आहेत. नवी मुंबईत भाजपचे दिग्गज नेते गणेश नाईक यांच्यासमोर शिवसेनेने मोठे आव्हान उभे केले आहे. नाईकांमुळे भाजप इथे सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी शिवसेनेने फोडाफोडीचे राजकारण करत अनेक जुन्या नगरसेवकांना आपल्या गळाला लावले आहे. 14 गावांच्या समावेशाचा मुद्दा आणि मुख्यमंत्र्यांचा थेट हस्तक्षेप यामुळे इथली सत्ता कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप-शिवसेनेला आघाडी
कल्याण-डोंबिवलीमध्ये आधीच भाजप-शिवसेनेच्या 21 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत, त्यामुळे निवडणुकीआधीच इथे भाजप-शिवसेनेने आघाडी घेतली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच झाली आणि दोन्ही पक्षांनी 'आरपारची' लढाई लढण्याचे संकेत दिले. खासदार श्रीकांत शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे.
मिरा-भाईंदर: या शहरात भाजप आणि शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील राजकीय संघर्ष या निवडणुकीच्या निमित्ताने तीव्र झाला होता.
उल्हासनगरमध्ये भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे.
बदललेली राजकीय समीकरणे
यंदाच्या निवडणुकीत काही नवीन युती आणि आघाड्यांचे चित्र पाहायला मिळालं.
ठाकरे-राज युती : मुंबईप्रमाणेच महामुंबईतही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे प्रतिबिंब उमटलं, मात्र काही ठिकाणी 'उबाठा' आणि मनसेचे उमेदवार समोरासमोर असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला.
राष्ट्रवादीचा 'एकला चलो रे' पवित्रा : राष्ट्रवादी काँग्रेसने महायुती किंवा महाविकास आघाडीच्या गणितात न अडकता अनेक ठिकाणी स्वतंत्र ताकद आजमावण्याचे ठरवले आहे.
पनवेलमध्ये 'भाजप विरुद्ध सर्व': पनवेलमध्ये ठाकूर कुटुंबाच्या भाजप प्रवेशानंतर पक्षाची पकड मजबूत झाली आहे. इथे शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आपली जुनी सत्ता टिकवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत मिळून एकाकी झुंज देत आहे.
