राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे १४ डिसेंबर रोजी सूप वाजले. त्यानंतर तब्बल सात-आठ वर्षे रखडलेल्या या निवडणुकांची घोषणा १५ डिसेंबरनंतर केव्हाही होऊ शकते, असे म्हटले जात होते. त्यानंतर आता येत्या २४ तासांमध्ये महापालिका निवडणुकीच्या घोषणेसोबच आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रियेला वेग येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भूमिपूजन, उद्घाटन कार्यक्रमांचा धडाका...
advertisement
आज १५ डिसेंबर रोजी राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर महत्त्वाचे मंत्री उद्घाटन, भूमिपूजन कार्यक्रमास हजर राहणार आहेत.
निवडणूक आयोगाचा प्लॅन तयार, मतदान-निकाल कधी?
मागील काही दिवसांपासून राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठीची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. मतदारयादीदेखील अंतिम करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक प्रक्रिया फक्त ३० दिवसांत पूर्ण केली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील महापालिका निवडणुका या एकाच टप्प्यात होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होईल. तर, मतमोजणी १७ जानेवारी रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे सोमवारी किंवा शुक्रवारी मतदान झाल्यास नागरिक सुट्ट्या जोडून बाहेर पडतात आणि मतदानाची टक्केवारी घसरते, त्यामुळेच मधल्या दिवशी मतदान घेण्याचा निर्णय झाल्याची शक्यता आहे. तर, १५ जानेवारीनंतरचा आठवडा हा २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन (शु्क्रवार), चौथा शनिवार-रविवार असा लाँग वीकेंड असणार आहे. त्यामुळेच १५ जानेवारी मतदान होणार असल्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
