गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला सोमवारी मोठा दिलासा दिला. निवडणुकांचे आयोजन आणि तयारी करण्यासाठी न्यायालयाने आयोगाला वाढीव १५ दिवसांची मुदत दिली. राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने ही विनंती मान्य केली. याआधी सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
advertisement
निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिल्यानंतर किती टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार आहे. आज सांयकाळी ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे.
किती टप्प्यांत होणार निवडणूक?
राज्यातील जादा आरक्षणासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदांव्यतिरिक्त, ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यात घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक होणार असल्याची माहिती आहे.
ज्या जिल्हा परिषदांमध्ये जादा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे, त्या वगळून उर्वरित जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतरच घेण्यात येतील, असेही सूत्रांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात कुठं निवडणूक?
पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (कोकण विभाग), पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर (पुणे विभाग) तसेच छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर (छत्रपती संभाजीनगर विभाग) या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रायगडमधील १५, रत्नागिरी ९, सिंधुदुर्ग ८, पुणे १३, सातारा ११, सांगली १०, सोलापूर ११, कोल्हापूर ११, छत्रपती संभाजीनगर ९, परभणी ९, धाराशिव ८ आणि लातूरमधील १० अशा एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकाही जिल्हा परिषदांसोबतच होतील, अशी शक्यता आहे.
