विदर्भासह सोलापूर-ठाणे होरपळले!
यंदाचा उन्हाळा भीषण असेल, असा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला होता, पण मार्चच्या पहिल्या १० दिवसांतच तापमानाने ४० अंशांचा आकडा पार केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. केवळ अकोलाच नाही, तर सोलापूरमध्येही पारा ४०.२ अंशांवर गेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, किनारपट्टीच्या जवळ असूनही ठाण्यात तापमान ३९ अंशांच्या घरात पोहोचले आहे. वाशिम, अमरावती, वर्धा आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्येही तापमान ३९ अंशांच्या पुढे गेले असून, दुपारी घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे.
advertisement
दिल्लीतही १५ वर्षांचा विक्रम मोडीत
राजधानी दिल्लीत सामान्यतः मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात तापमान ३५ अंशांच्या पुढे जाते, मात्र यंदा ७ मार्च रोजीच पारा ३५ अंशांच्या पार गेला आहे. राजस्थानमधील बाडमेरमध्ये तापमान सामान्यपेक्षा ६.५ अंशांनी जास्त असल्याने तिथे भीषण उष्णतेची लाट आहे. जर हे तापमान सामान्यपेक्षा ७ अंशांनी जास्त झाले, तर ती 'सीवियर हीट वेव्ह' मानली जाते.
पिकांवर काय होणार परिणाम?
वेळेआधी आलेल्या या उष्णतेचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे. गहू आणि इतर पिकांना दाणे भरण्याच्या काळात थंडीची आवश्यकता असते. मात्र, आता उष्णता अचानक वाढल्याने पिके वेळेपूर्वीच परिपक्व होतील. ज्या शेंगभाज्या अथवा बिया असलेली फळ आहेत ती लवकर खराब होण्याचा धोका असतो. पिकांच्या उत्पादनात आणि गुणवत्तेत मोठी घट होईल. गुजरात, राजस्थानसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर यामुळे मोठे संकट उभे राहिले आहे.
अरबी समुद्रातील 'या' बदलामुळे महाराष्ट्र तापला! मार्चमध्येच उष्णतेची लाट येण्याचं नेमकं कारण काय?
उन्हाचा तडाखा का वाढला?
स्कायमेट हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांच्या मते, सध्या राजस्थान आणि पश्चिम पाकिस्तानच्या बाजूने येणारे अँटी-सायक्लोन सक्रिय झाले आहे. यामुळे आकाशातील ढग पूर्णपणे गायब झाले असून कडक ऊन जमिनीवर येत आहे. तसेच, उत्तर-पश्चिमेकडून येणारे कोरडे आणि गरम वारे महाराष्ट्राच्या विदर्भापर्यंत पोहोचत असल्याने तापमानात अचानक मोठी वाढ झाली आहे.
पाऊस कुठे पडणार?
एकीकडे महाराष्ट्र तापत असताना, उत्तरेकडे एक 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' सक्रिय झाला आहे. यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशच्या उंच डोंगराळ भागात आज रात्रीपासून हलका पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच १० आणि ११ मार्च रोजी ईशान्य भारत आणि केरळच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात तूर्तास तरी पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
