पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीसाठी अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. अजित पवार विरुद्ध भाजप असे चित्र दोन्ही महापालिकेत दिसणार आहे. त्यानंतर आणखी एका महत्त्वाच्या महापालिकेत राष्ट्रवादीने स्वबळाची घोषणा केली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढवण्यात येणार असल्याची घोषणा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत असतानाच ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार गटाने वेगळी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ठाणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. ठाण्यात राष्ट्रवादीने महायुतीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ठाणे महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र या घोषणेनंतरही अजित पवार गटाची भूमिका स्पष्ट नव्हती.
नजीब मुल्ला यांनी ठाणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केला. “आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत, मात्र ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप किंवा शिंदे गटासोबत युती करणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका नजीब मुल्ला यांनी मांडली. हा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचेही मुल्ला यांनी सांगितले. कार्यकर्त्यांकडूनही स्वबळावर निवडणूक लढवण्याची जोरदार मागणी होत होती, त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
ठाणे महापालिका क्षेत्रातील विशेषतः मुस्लीमबहुल मुंब्रा आणि आसपासच्या भागांतील राजकीय समीकरणे लक्षात घेता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची रणनीती आखण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार गटाच्या या भूमिकेमुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याने शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठं आव्हान मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.
