सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्षांमध्ये तणाव पाहायला मिळत आहे. स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेनेत वाढलेला विसंवाद आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवत शिवसेनेच्या नेत्यांविरोधात तक्रार केली असून, कठोर कारवाईची मागणी केली आहे.
शिवसेनेकडून भाजप पदाधिकाऱ्यांना प्रलोभने?
सावंत यांनी पत्रात गंभीर आरोप करत म्हटले आहे की, शिवसेनेचे काही स्थानिक नेते आणि पदाधिकारी कुडाळ-मालवण आणि सावंतवाडी या विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशासाठी आमिष देत आहेत. हे आमिष केवळ राजकीय नाही तर थेट आर्थिक स्वरूपाचे असून, विकासकामांमध्ये सहभागी करून घेण्याचे आश्वासनही देण्यात येत आहे.
advertisement
पक्षीय मर्यादा ओलांडल्या जात असल्याचा आरोप
सावंत यांच्या म्हणण्यानुसार, भाजपचे कार्यकर्ते जिल्ह्यात आपले संघटन बळकट करत असतानाच, शिवसेनेचे काही पदाधिकारी जाणीवपूर्वक भाजप कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत. "यामुळे महायुतीच्या समन्वयात बिघाड होतो आहे. अनेक पदाधिकारी मानसिक तणावात आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा अतिशय गंभीर आहे," असं सावंत यांनी पत्रात नमूद केलं आहे.
भाजपची आचारसंहितेची आठवण
याआधीही भाजपकडून महायुतीच्या अंतर्गत आचारसंहिता पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, "आता शिवसेनेतील काही जबाबदार नेतेच आचारसंहितेचा भंग करत आहेत. त्यामुळे गोंधळ वाढत आहे," असं भाजपच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
राजकीय घडामोडींना वेग?
सिंधुदुर्ग हा भाजप आणि शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. येथील सत्ता समीकरणे नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहेत. अशा परिस्थितीत एकमेकांच्या गोटात हस्तक्षेप होणे, हे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या एकसंधतेसाठी धोकादायक ठरू शकते, अशी चिन्हे आहेत. सिंधुदुर्गमध्ये दोन्ही पक्षांकडून पक्ष विस्ताराकडे भर देण्यात येत आहे. भाजपकडून खासदार नारायण राणे आहेत. तर, नितेश राणे हे भाजपकडून मंत्री आहेत. नारायण राणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत.
