मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी भूम परंडा तालुक्यात चिंचपुर ढगे आणि बेलगाव परिसरातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या भागांना भेट देऊन शेतकऱ्यांची व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेतली. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आणि त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
मदतीला दिरंगाई केली तर महाराष्ट्र जाम करू- जरांगे
मनोज जरांगे पाटील म्हणाले, सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीपिके आडवी झाली आहेत. जनावरांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला भरीव मदतीची गरज आहे. राज्य सरकारने पंचनामे, कागदपत्रे असले प्रकार करून बळीराजाला मदतीसाठी वाट पाहू देऊ नये. लवकरात लवकर मदत करा नाहीतर आम्ही महाराष्ट्र जाम करू, असा इशारा त्यांनी दिला.
advertisement
मराठवाडा पाण्याखाली, बळीराजाचे प्रचंड नुकसान
मराठवाड्यातील प्रचंड पावसाने पिके उध्वस्त झाली आहेत, संसार वाहून गेला आहे. शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहेत. धाराशिव, लातूर, बीड, सोलापूर जिल्ह्यांतील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आहे.
राज्य सरकारने तातडीची मदत देणे सुरू केले-मुख्यमंत्र्यांचा दावा
राज्य सरकारने तातडीची मदत देणे सुरू केले असून, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी निमगांव, ता. माढा, जि. सोलापूर येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. यावेळी मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.