मंत्रालयात सकाळी ११ वाजता सोडत...
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात ही प्रक्रिया पार पडेल. ही सोडत २०११ च्या जनगणनेच्या आधारावर आणि चक्राकार (Rotation) पद्धतीने काढली जाणार आहे. यापूर्वीची आरक्षणाची पदे वगळून नवीन सोडत काढली जाणार असल्याने अनेक मोठ्या राजकीय गणितांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
advertisement
आरक्षणाचे स्वरूप कसे असेल?
सोडतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी सोडत काढली जाईल. दुसऱ्या टप्प्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) प्रवर्गासाठी सोडत निघेल. त्याशिवाय, या सर्व प्रवर्गांमध्ये आणि खुल्या गटातही ५० टक्के पदे महिलांसाठी आरक्षित केली जातील.
'या' महत्वाच्या शहरांच्या भवितव्याचा निर्णय
राज्यातील एकूण २९ महापालिकांसाठी ही सोडत होणार आहे. विभागनिहाय कोणत्या महापालिकांसाठी आरक्षण
मुंबई महानगर क्षेत्र: मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, भिवंडी-निजामपूर आणि पनवेल.
पश्चिम महाराष्ट्र: पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी आणि सोलापूर.
उत्तर महाराष्ट्र: नाशिक, अहिल्यानगर, मालेगाव, धुळे आणि जळगाव.
विदर्भ-मराठवाडा: नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर आणि नांदेड.
महापौरपद आरक्षित झाल्यामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेला लगाम बसू शकतो, तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे या सोडतीनंतर सर्वच राजकीय पक्षांच्या रणनीतीमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळतील.
मुंबईत ठाकरेंची इच्छा देव पूर्ण करणार?
मुंबई महापालिकेत भाजपकडे ८९ जागा असून ते सर्वात मोठे पक्ष आहेत. मात्र, जर महापौरपद ST (अनुसूचित जमाती) प्रवर्गासाठी आरक्षित झाले, तर भाजप-शिंदे गटाकडे या प्रवर्गाचा नगरसेवक नसल्याने ठाकरे गटाचा (शिवसेना UBT) महापौर होऊ शकतो. ठाकरे गटाकडे या प्रवर्गातील दोन नगरसेवक आहेत.
