नार्वेकरांचा सवाल, "नक्की काय चाललंय?"
मिलिंद नार्वेकर यांनी मुंबईच्या नवनिर्वाचित महापौरांच्या संदर्भात एक सूचक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी महापौरांविरोधातील दोन बातम्यांची कात्रणे जोडली असून, "नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय?" असा थेट सवाल उपस्थित केला आहे. नार्वेकर यांच्या या प्रश्नामुळे भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
महापौरांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जातेय?
नार्वेकर यांनी शेअर केलेल्या बातम्यांच्या कात्रणांवरून असा संकेत मिळत आहे की, स्वतःच्याच पक्षातील काही गट महापौरांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत. विशेषतः महापौरांच्या कारवरील लाल आणि निळ्या दिव्यांच्या वापरावरून सध्या जोरदार चर्चा आणि वाद सुरू आहेत. महापौरांच्या अधिकारांवरून किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवरून पक्षातच दोन गट पडले आहेत का, अशी शंका या ट्विटमुळे अधिक गडद झाली आहे.
मुंबई महापालिकेतून सत्ता गेल्यानंतर आता ठाकरे गट भाजपमधील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे म्हटले जात आहे. भाजपमधील संभाव्य गटबाजीवर बोट ठेवून नार्वेकरांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे. एकीकडे महापौरांना सहानुभूती दर्शवणे आणि दुसरीकडे भाजपमधील विसंवाद चव्हाट्यावर आणणे, असा दुहेरी डाव यामागे असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनाई आदेश असताना महापौरांनी अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत प्रशासनाला पत्र लिहिले होते. त्या पत्रानंतर भाजपात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती.
