मुंबईत गणेशोत्सव सूरू असताना वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेज आला होता. मुंबईत 34 बॉम्ब ठेवण्यात आले आहेत आणि 14 पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले आहेत. तसेच या मेसेजमध्ये 400 किलो ड्रग्ज वापरला जाईल, याचीही माहिती देण्यात आली होती. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या धमकीमुळे मुंबईत खळबळ उडाली होती.त्याचसोबत मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी करत कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
advertisement
दरम्यान या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी कसून चौकशीला सूरूवात केली होती. या चौकशी दरम्यान पोलिसांनी अश्विनी कुमार या आरोपीला अटक केली होती. आरोपी बिहारच्या पाटणामध्ये राहणार आहे. पण गेल्या 5 वर्षापासून तो नोएडामध्ये राहतो. तो ज्योतिष असल्याची माहिती आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून 7 मोबाईल, 3 सिमकार्ड, एक एक्सटर्नल स्लॉट, सहा मेमरी कार्ड होल्डर, दोन डिजिटल कार्ड आणि 4 सिमकार्ड होल्डर जप्त केले होते.
या आरोपीला आता पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून मुंबईत आणण्यात आले आहे.या दरम्यान करण्यात आलेल्या तपासात धक्कादायक खुलासा समोर आला आहे.अश्विनी कुमारने त्याच्या मित्र फिरोजच्या नावाने हा धमकीचा मेसेज पाठवला होता. पैशांच्या व्यवहारातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. याच भांडणाच्या रागातून त्याने हे कृत्य केले होते. फिरोजने या भांडणानंतर फुलवारी शरीफ पोलीस ठाण्यात अश्निनी कुमार विरोधात गुन्हा दाखल केला होता.यामुळे त्याला तीन महिने तुरंगात रहावे लागले होते.त्यामुळे याचाच राग मनात धरून पुर्ववैमनस्यातून अश्निनी कुमारने फिरोजच्या नावाने धमकी दिली होती, जेणेकरून त्याला अटक व्हावी.
विशेष म्हणजे आरोपीने स्वत:ला लष्करी तोएबा संघटनेचा सदस्य असल्याचे सांगत धमकी दिली होती. पण त्याचा हेतू दशहत पसरवण्याचा नव्हता पण त्याच्या मित्राला अडकवण्याचा होता.त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट होताच पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.