नक्की वाद काय आहे?
कोस्टल रोडवर जगातला पाचवा आणि भारतातील पहिला 'म्युझिकल रोड' प्रयोग करण्यात आला आहे. गाड्यांच्या चाकांचा रस्त्यावरील पट्ट्यांशी संपर्क आला की संगीताचे सूर उमटतात. मात्र, पहाटे ६ पासून मध्यरात्रीपर्यंत सतत वाजणाऱ्या या संगीतामुळे ब्रिच कँडी परिसरातील सुमारे ६५० रहिवासी हैराण झाले आहेत.
रहिवाशांच्या मुख्य तक्रारी:
सततच्या संगीतामुळे परिसरातील शांतता भंग पावत असून वरिष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली. रस्त्यावर वाजणाऱ्या संगीतामुळे चालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
पहाटेपासून सुरू होणारा हा 'लाईव्ह कॉन्सर्ट' रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याने "आम्ही झोपायचं कधी?" असा सवाल केला आहे. "गाड्या सतत धावतायत आणि गाणीही सतत वाजतायत; हा अनुभव म्हणजे आमच्यासाठी 'साउंडट्रॅक ऑफ स्ट्रेस' ठरतोय!" - ब्रिच कँडी रहिवासी संघटनेने म्हटले.
राजकारण तापलं!
या तक्रारीनंतर ब्रिच कँडी रहिवासी संघटनांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापालिका आयुक्तांना पत्र धाडले आहे. दुसरीकडे, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी रहिवाशांचे दावे फेटाळले असून, "हा आवाज इमारतींपर्यंत पोहोचत नाही," असा दावा केला आहे.
कोस्टल रोडवरचा हा गाण्यांचा प्रयोग सुरू राहणार की रहिवाशांच्या दबावामुळे प्रशासनाला हे 'म्युझिक' बंद करावे लागणार?, असा आता प्रश्न उपस्थित होऊ लागला. आहे.
