भाजपचे राज्यातील आणि मुंबईतील नेतृत्व दिल्लीत दाखल झाले आहे. भाजपकडे सर्वाधिक जागा असल्या तरी बहुमतापेक्षा कमी आहेत. तर, दुसरीकडे शिंदे गटाने अडीच वर्षासाठी महापौर पद मागितले आहे. सत्ता वाटपाचा तिढा कायम असताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना तीन दिवस मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले होते. त्यावर भाजपने आपल्या पक्ष नेतृत्त्वाकडे नाराजी व्यक्त केली होती. आता दिल्लीतच मुंबई महापालिकेतील सत्ता वाटपावर तोडगा निघणार असल्याची चर्चा आहे.
advertisement
सत्तेच्या वाटाघाटीला वेग...
एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार खासदार राहुल शेवाळे तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. तिथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची महत्त्वाची बैठक होणार असून, मुंबईच्या सत्तेचं 'वाटप' फायनल होण्याची शक्यता आहे.
एकीकडे फूट पडण्याच्या भीतीने सर्व नगरसेवक गेल्या तीन दिवसांपासून पंचतारांकित हॉटेलमध्ये 'बंदिवान' असताना, दुसरीकडे राहुल शेवाळे दिल्लीत भाजपच्या हायकमांडशी चर्चा करत आहेत. मुंबई महापालिकेचे अर्थकारण ज्यांच्या हातात असते, त्या महत्त्वाच्या समित्या आणि महापौर पदाबाबत या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो.
शिंदे गटाचा भावनिक कार्ड...
निवडणुकीत भाजपच्या तुलनेत संख्याबळ कमी असूनही, शिंदे गटाने सुरुवातीपासूनच महापौर पदावर दावा ठोकला आहे.२३ जानेवारीपासून शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे या वर्षात शिवसेनेचाच महापौर असावा आणि हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा 'इमोशनल कार्ड' शिंदे गटाने खेळलं आहे.
स्थायी समिती की महापौर पद?
जर महापौर पदावरून भाजपशी तणाव वाढला, तर शिंदे गट तडजोड करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईच्या तिजोरीची चावी ज्यांच्याकडे असते, त्या स्थायी समितीवर (Standing Committee) शिंदे गट आपला दावा अधिक भक्कम करू शकतो. याशिवाय सुधार, शिक्षण, बेस्ट आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांवरही आपलाच वर्चस्व ठेवण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे.
...मग तडजोड करायची!
शिंदे गटाची ही जुनी रणनीती राहिली आहे. सुरुवातीला मोठ्या पदांची मागणी करायची आणि वाटाघाटीमध्ये आक्रमक राहून नंतर स्वतःच्या फायद्याची पदे पदरात पाडून घ्यायची. या रणनीतीमुळे भाजपच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरली आहे.
भाजपही महापौरपदावर ठाम...
भाजपने महापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्ष पदावरील दावा सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप कोणत्याही परिस्थितीत महापौर सोडणार नाही, त्याशिवाय स्थायी समितीवरही आपला अधिकार कायम ठेवणार असल्याचा निरोप एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
