भिवंडी: भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली असून भारतीय जनता पक्षाने (भाजप) बिनविरोध विजयांची ‘हॅट्रिक’ साधत आपली ताकद दाखवून दिली आहे. शेवटच्या क्षणी विरोधकांकडून अर्ज माघारी घेतले गेल्याने भाजपचे तब्बल ५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून, याआधी जाहीर झालेल्या एका जागेसह भाजपाचे एकूण ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या यशामुळे भिवंडीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
advertisement
विशेष बाब म्हणजे, या बिनविरोध विजयी उमेदवारांमध्ये अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील एका उमेदवाराचाही समावेश आहे. त्यामुळे भाजपने केवळ राजकीय बळकटीच दाखवली नाही, तर सामाजिक समावेशकतेचाही संदेश दिल्याची चर्चा शहरात सुरू आहे. पालिकेतील प्रभाग क्रमांक 18 (क) मधून पक्षाचे उमेदवार अबूसूद अशफाक अहमद शेख यांचा बिनविरोध विजय झाला आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपने केरळमध्ये देखील असाच प्रयोग केला होता. त्रिशूर महानगरपालिकेतील कन्ननकुलंगरा वॉर्डातून भाजपाच्या मुस्लिम उमेदवार मुमताज यांनी विजय मिळवला होता. आता भिवंडीत मात्र भाजपने थेट मुस्लिम उमेदवाराला बिनविरोध निवडूण आणले आहे.
अर्ज माघारीच्या अखेरच्या तासांपर्यंत चित्र अस्पष्ट असताना, शेवटच्या क्षणी घडलेल्या घडामोडींमुळे भाजपाची विजयी घोडदौड वेगाने पुढे सरकली. अनेक प्रभागांमध्ये विरोधकांनी उमेदवारी मागे घेतल्याने भाजपच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला.
बिनविरोध विजयी झालेले भाजपचे उमेदवार पुढीलप्रमाणे:
प्रभाग क्रमांक 18 (अ) अश्विनी सन्नी फुटाणकर
प्रभाग क्रमांक 18 (ब) दीपा दीपक मढवी
प्रभाग क्रमांक 18 (क) अबूसूद अशफाक अहमद शेख
प्रभाग क्रमांक 16 (अ) परेश (राजू) चौघुले
प्रभाग क्रमांक 23 (ब) भारती हनुमान चौधरी
या निकालामुळे भिवंडी पालिकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजपने आधीच काही प्रभागांमध्ये मजबूत संघटन उभे केले होते, त्याचा थेट परिणाम आता बिनविरोध विजयांच्या रूपाने समोर येत आहे. आगामी निवडणूक रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर हे निकाल भाजपसाठी मनोबल वाढवणारे ठरले आहेत. भिवंडी पालिकेच्या निवडणुकीत पुढील टप्प्यात आणखी कोणकोणत्या प्रभागांमध्ये चुरस वाढणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
भाजपसाठी महापौरपदाची नांदी
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सतरा बंब सुमित पाटील यांनी बिनविरोध विजयाचा खाता खोलल्यानंतर, मांजरीचे शेवटच्या दिवशी परेश उर्फ राजू चौगुले, अश्विनी फुटाणकर, दीपा मढवी, अबुसाद अशपाक शेख हे चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. या विजयाचा जल्लोष भाजपा समर्थकांच्या वतीने जोरदार फटाकेबाजी आणि गुलाल उधळत करण्यात आला.
