नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्याकरिता नागपूरच्या यशवंत मैदानावर शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचे गेल्या पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. मात्र शासनाने योग्य दखल न घेतल्याने समितीने आज आंदोलन अधिक तीव्र केले होते.
राज्य शासनाने वेतन थकवल्याने शालार्थ शिक्षक संघर्ष समिती आक्रमक झाली. सरकारने आमच्या मागण्या विचारात घेऊन लवकरात लवकर आम्हाला वेतन द्यावे. गेल्या १० महिन्यांपासून आम्हाला पगार मिळालेला नाही, आम्ही आमचा संसार कसा चालवायचा? असे प्रश्न आंदोलकांनी सरकारला विचारला. रविवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. तरीही सरकार दखल घेत नसेल तर आम्ही आमच्या मागण्या कुणाकडे करायच्या? असा प्रश्नही आंदोलकांनी विचारला.
advertisement
अनेक महिलांना भोवळ आल्यानंतर पोलीस बचावासाठी पुढे सरसावले. भोवळ आलेल्या महिलांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदोलकांचे रौद्ररूप पाहता शिक्षक आमदार आंदोलनस्थळी भेट देण्याकरिता निघाले असल्याचे कळते.
