केंद्र सरकारने सुरुवातीला सूरत ते चेन्नई असा सुमारे १,२०० किलोमीटरचा हरितक्षेत्र महामार्ग उभारण्याची संकल्पना मांडली होती. मात्र महाराष्ट्रातील काही भागांत शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे हा संपूर्ण प्रकल्प पुढे नेणे अवघड झाले. परिणामी, सूरत–नाशिक हा टप्पा रद्द करण्यात आला आणि आता नाशिकपासून पुढील दक्षिणेकडील टप्प्यांवर भर देण्यात येत आहे. आडगाव येथून सुरू होणारा हा महामार्ग अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर मार्गे अक्कलकोटपर्यंत जाणार आहे.
advertisement
नाशिक जिल्ह्यातील नाशिक, निफाड आणि सिन्नर या तीन तालुक्यांतील एकूण ३० गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. या टप्प्यासाठी एकूण ३८७.३३ हेक्टर जमीन संपादित करणे अपेक्षित असून, त्यापैकी सुमारे २८० हेक्टर क्षेत्राचे संपादन पूर्ण झाले आहे. उर्वरित १०७.३३ हेक्टर क्षेत्राच्या संपादनातील विलंबामुळे प्रकल्पाची गती मंदावली होती. मात्र आता प्राधिकरणाने ठोस निर्णय घेत हरकती व सूचनांसाठी २१ दिवसांची वेळ देत प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान करण्याचे संकेत दिले आहेत. प्राप्त हरकतींची नोंद करून सक्षम अधिकाऱ्यांकडून त्यावर ठरावीक कालावधीत निर्णय दिला जाणार आहे.
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्राचा उत्तर–दक्षिण द्रुत संपर्क मजबूत होणार आहे. औद्योगिक क्षेत्राला जलद वाहतूक मार्ग उपलब्ध होणार असून, कृषी उत्पादनांच्या वाहतुकीचा खर्च आणि वेळ दोन्ही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांना मोठा लाभ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या गावांतून जाणार महामार्ग
नाशिक तालुका : आडगाव, विंचूरगवळी
निफाड तालुका : दारणासांगवी, सावळी, चाटोरी, चेहडी, हेदारणा, लालपाडी, रामनगर, पिंपळगाव निपाणी, तळवाले
सिन्नर तालुका : देशवंडी, पाटपिंपरी, बारनाव पिंपरी, निमगाव सिन्नर, गुळवंच, देवपूर, खोपडी, फर्दापूर, धारणगाव, भोकणी, पांगरी, फुलेनगर, वावी, थोडेवाडी, कहांडलवाडी
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
एकूण लांबी : सुमारे ३७४ किलोमीटर (नाशिक ते अक्कलकोट)
७० मीटर रुंदीचा मार्ग : १५२ किलोमीटर
६० मीटर रुंदीचा मार्ग : २२२ किलोमीटर
दऱ्याखोऱ्यांतून जाणारा विशेष मार्ग : ५.६ किलोमीटर
एकूणच २७ मोठे पूल आणि १६४ लहान पूल व जोडरस्ते असणार आहेत.
