मुंबई आता नाशिकमध्येही अनेक हॉटेल्स बंद होणार आहेत. कारण की, पुढचे 24 तास पुरेल इतकाच गॅसचा साठा नाशिकमधल्या अनेक हॉटेल व्यावसायिकांकडे उपलब्ध आहे. त्यामुळे पुढच्या 24 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील 80% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता थेट महाराष्ट्रातल्या जनतेलाही बसताना दिसत आहे. यामुळे अनेक हॉटेल कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा परिणाम संपूर्ण देशाला सध्या बसत आहे.
advertisement
नाशिक जिल्ह्यातही आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ बसत आहे. याचा फटका व्यावसायिक गॅस सिलिंडरवरही बसत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील हॉटेल्स आता बंद करण्याची वेळ आली आहे. सध्या नाशिकमधल्या हॉटेल्सची काय परिस्थिती आहे, याबद्दल न्यूज 18 मराठीच्या प्रतिनिधिंनी नाशिक जिल्हा हॉटेल अँड रेस्टॉरंट बार असोसिएशनच्या अध्यक्षांसोबत बातचीत केली. ते म्हणाले की, " केंद्र सरकारकडून आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅसच्या एजन्सीला पत्र पाठवत गॅसचा पुरवठाच बंद करण्याचे पत्र पाठवले आहे. त्यामुळे व्यावसायिक गॅस वापरणाऱ्या सर्व संबंधित कंपन्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे."
"देशातल्या प्रत्येक भागातील हॉटेल्सला याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक गॅस बंदचा सर्वांनाच मोठा फटका बसणार आहे. फक्त नागरिकांनाच नाही तर, व्यावसायिक गॅस संबंधित असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील हजारच्या आसपास हॉटेल्स आहेत. या सर्वांनाच सहाजिकच आता फटका बसणार आहे. गॅसला पर्यायी व्यवस्था नसल्याने सर्वांनाच या बंदचा फटका बसणार आहे." दरम्यान, या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी हॉटेल संघटना आता आक्रमक झाली आहे. संघटनेचे प्रतिनिधी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी सरकारकडे केली जाणार आहे. गॅस टंचाईचा हा विळखा केवळ मुंबईपुरता मर्यादित नाही. देशातल्या अनेक राज्यातील हॉटेल्सनी आपले कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
