नगर परिषद प्रशासनाने गुढीपाडव्यापासून त्र्यंबक शहराला एक दिवसा आड पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती दिली आहे. शहराला पाणी पुरवठा दोन भागांमध्ये केला जाणार आहे. एका भागाला एक दिवस, दुसऱ्या भागाला दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा केला जाणार आहे. जेव्हा पाणी पुरवठा केला जाणार त्यावेळी फक्त 45 मिनिटेच पाणी मिळणार आहे. 45 मिनिटांमध्ये नागरिकांना दोन दिवस पुरेल इतका पाणी पुरवठा करण्याचे आवाहन केले असून जरा जपून पाणी वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. त्र्यंबक शहरामध्ये सार्वजनिक पाणवठे नाहीत.
advertisement
कपडे धुणे आणि वापराचे पाणी भरून आणता येईल, असे पाणीसाठेही नाहीत. त्यामुळे गृहिणींची कुचंबणा होत असते. सधन कुटुंब टँकरचे पाणी विकत घेतात तर, पिण्यासाठी जार वापरतात. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्याची गैरसोय सहन करावी लागत आहे. दरम्यान, वीजपुरवठा खंडित होतो, तेव्हा 48 तासांची मुदत 72 तासांवर सुद्धा जात असल्याची घटना घडते. सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात दररोज 24 तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, ते आश्वासन आजपर्यंत केव्हाच पूर्ण झालेले नाही. विधानसभा किंवा नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. जाहीर सभेत 24 तास शुद्ध नियमित पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अवघ्या दोन- अडीच महिन्यांत दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.
