नेमके प्रकरण काय?
मृत शादाब तांबोळी हा १८ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. २२ फेब्रुवारी रोजी परसूल-चिंचोली नदीतील पुलाखाली एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. तपासाअंती हे पार्थिव शादाबचे असल्याचं समोर आलं. पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि शादाबच्या गेल्या एक वर्षाच्या पार्श्वभूमीचा अभ्यास केला असता, संशयाची सुई त्याची पत्नी मुस्कान शादाब तांबोळी हिच्याकडे वळली.
advertisement
मुस्कानचे मनमाड येथील ऋषभ मनोज वर्मा (२३) याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात पती शादाब अडथळा ठरत असल्याने मुस्कानने त्याला कायमचे वाटेतून हटवण्याचा कट रचला. यात तिने आपला भाऊ शाहरूख शेख आणि त्याच्या मित्रांची मदत घेतली.
असा रचला हत्येचा बनाव
संशयितांनी शादाबला संपवण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध योजना आखली होती. सोन्याच्या दागिन्यांचा मोठा व्यवहार करायचा आहे, असं आमिष दाखवून त्याला मनमाड-मालेगाव रोडवरील एका बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर नेण्यात आले. तिथे शादाबची निर्घृण हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्याच्या हातापायाला लोखंडी डंबेल्स बांधून मृतदेह परसूल शिवारातील नदीत फेकून दिला.
शादाब बेपत्ता झाल्यापासून उगाव परिसरात मोठी खळबळ उडाली होती. त्याच्या मित्रपरिवाराने आणि गावकऱ्यांनी 'शादाबचा शोध घ्या' अशी मोहीम सोशल मीडियावर राबवली होती. इतकेच नाही, तर न्याय मिळावा यासाठी १५ दिवस स्थानिक पातळीवर मोर्चेही काढण्यात आले होते. या सर्व काळात मुस्कानने केवळ बनाव केला होता, मात्र पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तिचं बिंग फुटलं.
या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी आरोपी पत्नीसह सात जणांना अटक केली आहे. मुस्कान शादाब तांबोळी (मृताची पत्नी), ऋषभ मनोज वर्मा (प्रियकर), शाहरूख शेख (मुस्कानचा भाऊ), युवराज थोरात (वय १९, रा. मालेगाव), सलीम साबीर शेख (वय २८, रा. मालेगाव), आर्यन सुंदर जिनवाल (वय १९, रा. मालेगाव) आणि शेख एजाज शेख रियाज (वय २९, रा. मनमाड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. सर्व आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
