नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या अनुषंगाने नाशिकच्या तपोवन परिसरात बाराशे एकर जागेवर साधूग्राम साकारण्यात येणार आहे. याचं काम नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येत आहे. कुंभमेळ्यासाठी साधूंच्या निवासाकरिता नाशिकच्या तपोवनातील वृक्ष तोडीचा मुद्दा राज्यभरात गाजत आहे. नाशिकमधील पर्यावरण प्रेमी जनता आणि राज्यातील सुजाण नागरिकांनी वृक्षतोडीवर एल्गार पुकारला आहे.
advertisement
हरित लवादाने काय आदेश दिले?
हरित लवादाने या प्रकरणी नाशिक महापालिकेला आदेश देत या परिसरातील एकही वृक्ष तोडू नये ,त्याच बरोबर वृक्षतोडी बाबतचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत या बाबत सर्वोच न्यायालयाचे कायदेतज्ञ , श्रीराम पिंगळे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेची तत्काळ दखल घेत हरित लवादाने संबंधितांना आदेश दिले आहेत.
वृक्षप्रेमी आक्रमक
31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहण सोहळ्याने अधिकृतरित्या कुंभमेळ्यास सुरुवात होईल. त्यानंतर देशभरातून साधू महंतांचे आगमन होईल. नाशिकमधे वैष्णव पंथाच्या तीन आखाड्यातील साधू पंचवटी येथील गोदातीरी स्नान करतात. त्यांना राहण्यासाठी साधूग्राममध्ये नियोजन केलं जातं. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने साधूग्रामच्या विकासासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम ते बटुक हनुमान मंदिरापर्यंतच्या परिसरातील वृक्षांची मोजणी केली. त्यात सर्वाधिक बाभूळ वृक्ष आणि झुडूपं असून साधुग्रामसाठी हा भूखंड मोकळा करण्याची गरज असल्यानं झाडांची कत्तल केली जाणार असल्यानं वृक्षप्रेमी आक्रमक झाले आहेत.
