काय नेमकं प्रकरण?
6 फेब्रुवारी रोजी खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील एका शेतविहिरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांचा तपासात धक्कादायक बाब उघडली. मृत तरुण हा नवी मुंबईतील कळंबोली येथील रहिवासी होता. त्याचे रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार भिसे यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याच कारणातून हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
advertisement
191 किलोमीटरचा प्रवास
पोलिसांनी हवालदार भिसे यांच्यावर संशय आला. त्यांच्या पत्नीचे मृत व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा वाद सुरू झाला होता. भिसे याने मृत तरुणाला भेटायला बोलावले. त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपी हवालदाराने मृतदेह कारमध्ये चालकाच्या शेजारच्या सीटवर बसवला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून मृतदेह जिवंत माणसाप्रमाणे बसवून त्याने नवी मुंबई ते सातारा असा 191 किलोमीटरचा प्रवास केला. लोणंदमधील सुखेड परिसरात पोहोचल्यावर त्याने मृतदेह एका विहिरीत टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केला.
अर्धवट जळालेला मृतदेह…
मात्र, मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत राहिल्याने त्याचा बनाव फसला. स्थानिकांना मृतदेह दिसताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतले. लोणंद पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे तांत्रिक तपास केला. आरोपी आणि मृत व्यक्तीचे मोबाईल लोकेशन एकाच मार्गावर आढळले. महामार्गावरील टोल नाके आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या वाहनाचा मागोवा घेतला.
आरोपी अटकेत
संशय बळावल्यानंतर नवी मुंबईतून हवालदार भिसे याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
