नवी मुंबईत सध्या मोठे राजकीय नाट्य रंगताना दिसत आहे. भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांना जाहीर आव्हान दिले आहे. आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकूण १११ नगरसेवक वॉर्ड असून सगळेच्या सगळे जिंकून आणा, अन्यथा मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे थेट आव्हान मंदा म्हात्रे यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
advertisement
दरम्यान, आमदार मंदा म्हात्रे यांच्या निकटवर्तीय १३ इच्छुक उमेदवारांना स्वाक्षरी नसलेले एबी फॉर्म देण्यात आल्याने पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. हा प्रकार नाईक कुटुंबियांनी जाणीवपूर्वक घडवून आणला, असा गंभीर आरोप मंदा म्हात्रे यांनी केला आहे.
स्वाक्षरी नसलेला एबी फॉर्म देत कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण झाल्याचे सांगत, पक्ष संघटनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही मंदा म्हात्रे यांनी केला. तसेच, ज्यांची राजकीय कारकीर्द नेहमीच पक्षविरोधी राहिली आहे, याबाबत मंदा म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईक यांना थेट आव्हान दिले आहे.
या घडामोडींमुळे नवी मुंबईतील भाजपाच्या अंतर्गत राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, येत्या काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
