अमोल मिटकरी यांनी न्यूज १८ मराठी वाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अजित पवार यांच्या अपघाताची वेळ, नियमित वैमानिक नसणे, तसेच अजित पवार यांच्या सोबतीला नियमित लोकांची गैरहजेरी अशा विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. ज्या घड्याळाने अजित पवार यांना राज्यात ओळख मिळाली, त्याच घड्याळाचा आधार घेऊन त्यांचा मृतदेह शोधावा लागेल, असे स्थानिक लोक सांगत होते. मात्र यावरही अमोल मिटकरी यांनी शंका उपस्थित केली.
advertisement
अमोल मिटकरी यांना कोणकोणत्या गोष्टींवर शंका
अमोल मिटकरी म्हणाले, "अजित पवार यांच्या प्रवासासाठी हेच विमान का देण्यात आले? त्यांच्या प्रवासासाठी सुमित कपूर वैमानिक नसतानाही अखेरच्या क्षणी त्यांना पाचारण करण्यात आले. नियमित वैमानिक वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे कपूर यांना बोलविण्यात आल्याचे कारण कंपनीने सांगितले. अपघातावेळी विमानातून दोनदा मोठे आवाज आले. स्थानिक सरपंचांच्या म्हणण्यानुसार या विमानतळावर नेहमी अपघात होतात, परंतु विमानातून येणारा असा आवाज आम्ही पहिल्यांदाच ऐकला. या सगळ्या गोष्टी पाहता शंका घ्यायला वाव आहे"
अजितदादांचं घड्याळ त्यांच्या हातावर नव्हतंच!
तसेच अपघात घडल्यानंतर विमानाला आग लागली. लागलेल्या आगीत अजित पवार यांच्यासह बाकी प्रवासी जागेवर मृत पावले. मात्र विमानातील कागदपत्रांना काहीही झाले नाही. तिथल्या माळरानावर विमानातले कागद सगळीकडे पडलेले होते. अजित पवार यांच्या हातात आधी घड्याळ असल्याचे सांगितले गेले. मात्र अजित पवार यांचा मृतदेह ज्यावेळी शवविच्छेदनासाठी नेण्यात आला त्यावेळी त्यांचे घड्याळही दिसले नाही. त्या घड्याळाचे काय झाले हे पुढे सांगायला देखील कुणी तयार नाही, असेही अमोल मिटकरी म्हणाले.
आधी सांगितले की धुके होते म्हणून विमानाचे लँडिंग मात्र....
बारामतीत अपघातावेळी धुके होते म्हणून विमानाचे लँडिंग करण्यात आल्याचे आधी सांगण्यात आले. मात्र त्यावेळी लख्ख सूर्यप्रकाश होता, असे स्थानिक लोक सांगतात. मी देखील अपघातस्थळाची पाहणी केली. मलाही तिथे काही शंका घेण्यासारख्या बाबी आढळून आल्याचे मिटकरी म्हणाले.
