भाजप आणि काँग्रेसचे नेते एकमेकांवर सातत्यानं टीका करतात. राज्यात असो की देशात या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी असल्याने, ते कधीच एकत्र आले नाहीत. मात्र देशात घडलं नाही ते अंबरनाथमध्ये घडलं. अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदेंच्या शिवसेनेला भाजपनं धक्का दिला. शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला सारत भाजप आणि काँग्रेसनं एकमेकांचा हात हातात घेतला.
अंबरनाथचं पक्षीय बलाबल
advertisement
59 नगरसेवकांच्या अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 27 नगरसेवक आहेत. तर भाजपचे 14, एनसीपीचे 4 आणि काँग्रेसचे 12 नगरसेवक आहेत. मात्र भाजपने त्यांचे 14 नगरसेवक, काँग्रेसचे 12 नगरसेवक, राष्ट्रवादीचे 4 आणि एका अपक्ष नगरसेवकासह 31 चा आकडा गाठत 27 नगरसेवक असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला पिछाडीवर टाकलं.
नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करूंजले पाटील विजयी झाल्या होत्या. आता भाजपनं काँग्रसेची साथ दिल्याने शिंदेंच्या शिवसेनेनं प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
युती संदर्भातला पहिला प्रस्ताव भाजपने काँग्रेसकडे पाठवला होता असा दावा अंबरनाथ काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटलांनी केला. आपण भाजपसोबत नाही तर अंबरनाथ विकास आघाडीसोबत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र पाटील यांनी हा निर्णय घेताना पक्षाच्या प्रदेश कार्यालयाला अंधारात ठेवलं. त्यामुळे पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसंच 12 नगरसेवकांनाही निलंबित करण्यात आलं.
