जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबारात बुलढाणा जिल्ह्यातील पाच पर्यटक थोडक्यात बचावले. हे सर्वजण हल्ल्याच्या वेळी पहलगाममधील एका हॉटेलमध्येच होते आणि हॉटेल मालकाच्या सतर्कतेमुळे त्यांनी बाहेर जाणे टाळले, त्यामुळे त्यांचा जीव वाचला असल्याची घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील कुटुंबीय हे पर्यटनासाठी काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. हे पाचही जण 18 एप्रिल रोजी मुंबईहून जम्मू-काश्मीरच्या प्रवासाला निघाले होते. विविध ठिकाणांची सफर करून 21 एप्रिल रोजी रात्री ते पहलगाममध्ये पोहोचले.
advertisement
22 तारखेला सकाळी फिरायला जाण्याचा त्यांचा बेत होता, मात्र निघण्याच्या क्षणीच हॉटेल मालकाने त्यांना थांबवले. तुम्ही इथंच थांबा बाहेर पडू नका असे सांगितले . फायरिंगचा आवाज ऐकून संपूर्ण कुटुंब अत्यंत घाबरले होते. बुलढाण्यातली अरुण जैन यांचे भाऊ व त्यांची पत्नी व तीन मुले असे पाच जण पहलगाममध्ये अडकले. हॉटेल चालकाने वेळीच थांबवल्याने जैन कुटुंबीय सुखरुप बचावले. जैन कुटुंबीय हे सध्या हॉटेलमध्येच थांबल्याची माहिती समोर आली आहे.
दोन आठवड्यापूर्वी दहशतवादी भारतात...
दहशतवादी पहलगाममध्ये कोणत्या मार्गाने पोहोचले हे देखील उघड झाले आहे. सुरक्षा दलांशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की हे दहशतवादी सुमारे २ आठवड्यांपूर्वी भारतीय सीमेत घुसले होते. त्यानंतर तो राजौरी आणि वाधवन मार्गे पहलगामला पोहोचला. हे रियासी उधमपूर परिसरात येते.
मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात डोंबिवलीतील तीन, पुण्यातील दोन तर पनवेलमधील एकाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील इतर काही पर्यटक देखील जखमी असल्याचीही माहिती आहे. संबंधित पर्यटक घोडेस्वारी करत असताना नाव विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. मृतांमध्ये डोंबिवलीतील संजय लेले (44), अतुल मोने (52) आणि हेमंत जोशी, पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे आणि पनवेलमधील दिलीप देसले यांचा समावेश आहे.
