बेकायदेशीर प्लॉट विक्रीचं प्रकरण उघडकीस आल्यानं खळबळ
मानवत शहरातील बेकायदेशीर प्लॉट विक्रीचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये पाथरीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून हे प्लॉट विक्री झाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण गंभीर आहे. राज्यात तुकडे बंदी असताना, भूमाफिया महसूल विभागातील अधिकाऱ्यांना अशाप्रकारे हाताशी धरून, खोट्या कागदपत्रांच्या आधारे प्लॉट विक्री करत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात नागरिकांची फसवणूक होत असून, अशा प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
advertisement
मनसेकडून पीक विमा कार्यालयाची तोडफोड
परभणी जिल्ह्यातील पीक विमा प्रश्नावर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक होत विमा कार्यालयाची तोडफोड केली आहे. जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पाऊस गायब आहे. त्यामुळे मानवत, सेलू या भागातील पिकांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक गावांमधील पिके सुकून गेली आहेत. तर काही ठिकाणच्या पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. याविषयी विमा कंपनी आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी देखील करण्यात आल्या होत्या. परंतु विमा कंपनीने या पिकांचे पंचनामे करण्यास टाळाटाळ केली. याविषयी मनसेने अगोदरही पीक विमा कंपनीकडे तक्रार केली होती. त्याच वेळी कार्यालय फोडण्याचा इशारा देखील मनसेकडून देण्यात आला होता. परंतु या मागणीकडे विमा कंपनीने दुर्लक्ष केले, त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांकडून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
पत्रकारावर हल्ला प्रकरणांचा निषेध
पत्रकारांवर वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीत होणाऱ्या कुचराईच्या निषेधार्थ, या आठवड्यात परभणी जिल्ह्यात पत्रकारांचा संताप पाहायला मिळाला. पाचोरा येथे पत्रकारावर झालेल्या हल्ल्यानंतर, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पत्रकारांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे. पत्रकार हाल्ला विरोधी कायदा असूनही, नसल्यासारखा असल्याचा आरोप पत्रकारंमधून होत आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाच्या प्रतीची जिल्ह्यात होळी करण्यात आली.
रस्त्यांसाठी ग्रामीण भागातील नागरिकांचं आंदोलन
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना दळणवळणासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावापासून तालुक्यांना आणि जिल्ह्याला जोडणारे रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी या आठवड्यात अनेक आंदोलनं झाले. त्यामध्ये सोनपेठ तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. तर दुसरीकडे परभणी तालुक्यातील कोक येथे गावातील नागरिकांनी बोंब मारो आंदोलन करून, प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
सिंचन विहिरींच्या योजनेत जिल्हा प्रशासनाचा खोडा
शासनाची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असलेल्या सिंचन विहिरीच्या कार्यक्रमाला, परभणी जिल्ह्यात प्रशासनानेच खोडा घातल्याचं समोर आलं आहे. मागील चार महिन्यांपासून सिंचन विहिरीचे प्रस्ताव रखडले आहेत. प्रस्ताव रखडल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत. याविषयी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे चौकशी केली असता तांत्रिक कारण दिलं जातं आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला होता. परंतु प्रशासनातील बाबूगिरीमुळे, शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता शेतकरी देखील सिंचन विहिरीकडे दुर्लक्ष करू लागले आहेत.
