मागील २१ तासांपासून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हालअन्न पाण्याविना हाल होत असून प्रवासी अनेकजण मेटाकुटीला आले आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी प्रवाशांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. उष्णतेत वाहनांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना एक घोट पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले. असे असताना पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
advertisement
कोणकोणत्या फेऱ्या रद्द?
मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे, बोरीवलीकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. पुढील काही तासासाठी बसेस फेऱ्या बंद राहणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिलेल्या आहेत. वाहतूक सुरळीत झाल्यानंतर पुढचा निर्णय कळवला जाईल, असे एसटी प्रशासनाने सांगितले.
अपघाताच्या २२ तासानंतरही वाहनांच्या रांगा ५० किमीपर्यंत
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याने मोठी गळती सुरू होती. काल दुपारी चार, साडे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. तेव्हापासून द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली. अपघाताच्या २२ तासानंतरही वाहनांच्या रांगा ५० किमीपर्यंत आहेत.
वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू
दरम्यान, प्रशासनाकडून गॅस टँकर हटवण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कामाला विलंब होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे या कठीण परिस्थितीत स्थानिक सेवाभावी संस्था तसेच धर्मापाल तंतरपाळे यांनी पुढाकार घेत हजारो पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना वितरित केल्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला असून, काही प्रमाणात तरी आधार मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
